
सोलापूर प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्यातील चौडेश्वरवाडी येथील उषाताई साठे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि या प्रकरणाची सुनावणी जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात व्हावी, या मागणीसाठी सकल बहुजन समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाची प्रशासनाने दखल घेतली आहे. संबंधित मागण्यांचे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन पोलिसांनी आंदोलकांना दिले आहे.
१२ जुलै रोजी माळखांबी येथे पीडित महिलेचे पती विजय साठे व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली सकल बहुजन समाजाने भव्य मोर्चा काढला होता. या आंदोलनात आरोपींना कठोर शिक्षा आणि प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती.
मोर्चानंतर तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी), माळशिरस विभाग, अकलूज यांनी आंदोलकांचे प्रतिनिधी बिभीषण साठे, सतीश साठे, महेश साठे आणि विशाल साठे यांना अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात सकल बहुजन समाजाकडून प्राप्त झालेले निवेदन संबंधित कायदेशीर व वरिष्ठ विभागाकडे तातडीने पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतल्यामुळे आंदोलक आणि सकल बहुजन समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया कायद्यानुसार पुढे सुरू राहणार असून, या खटल्याबाबत पुढील निर्णय न्यायालय आणि संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून घेतला जाणार आहे.
पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि प्रकरणाची जलद सुनावणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
