सारथी महाराष्ट्राचा न्यूज | श्रीरामपूर प्रतिनिधी
राज्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, श्रीरामपूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
या सुधारित योजनेअंतर्गत भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस तसेच खरीप कांदा या प्रमुख पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदविता येणार असून, अर्ज स्वतः किंवा बँक अथवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या माध्यमातून भरता येईल.
योजनेसाठी आवश्यक अटी
- जमिनीची अधिकृत कागदपत्रे व पीक लागवड घोषणापत्र आवश्यक.
- आधार क्रमांक बँक खात्याशी तसेच आधार-संलग्न पेमेंट प्रणालीशी जोडलेला असावा.
- किमान ०.१० हेक्टर क्षेत्रावर संबंधित पीक लागवड असणे आवश्यक.
- विमा अर्जातील पीक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील पीक यामध्ये तफावत आढळल्यास सर्व्हेमधील नोंद अंतिम मानली जाईल.
- चुकीची माहिती देऊन किंवा गैरमार्गाने अर्ज केल्याचे आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांनी सांगितले की, योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे विविध कृषी योजनांपासून वंचित ठेवण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अचूक माहिती देऊन नियोजित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कृषी विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण सुनिश्चित करावे, असेही आवाहन केले आहे.
