
कणकवली | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे एकदिवसीय उपोषण करण्यात आले. या आंदोलनात कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर टीका केली.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी NEET व TET परीक्षांच्या कथित पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत, वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याची भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाकडे लक्ष वेधत, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे मत व्यक्त केले. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या आंदोलनात नगरसेवक संकेत नाईक, जयेश दुमाळे, वैभव मालंडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण, परीक्षांमधील पारदर्शकता आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.
