
श्रीगोंदा : प्रतिनिधी
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शनिवारी (दि. १८ जुलै २०२६) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठविण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्याकडे सुपूर्द केले.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते अरविंद कापसे, राजेंद्र नागवडे, स्मितल वाबळे आणि उद्धव गायकवाड यांनी सहभाग घेत उपोषण केले.
आंदोलकांनी आरोप केला की, नीट परीक्षा गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला असून, या प्रकरणात केंद्र सरकार ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. तसेच लडाखसंदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दलही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ शेतकरी नेते अनिल घनवट, अनिल कोकाटे, विलास वाघमारे, शांताराम पोटे, श्रीकांत ठवाल, शिवप्रसाद उबाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन समर्थन व्यक्त केले.
