
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | माढा | प्रतिनिधी :
माढा तालुक्यातील आढेगाव व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांच्या पावसाच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
पावसाअभावी परिसरातील पिके मोठ्या प्रमाणात सुकू लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. वर उजनी धरण असतानाही वीज समस्येमुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
मात्र, अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे आढेगावसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाल्याने आगामी खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.



