श्रीरामपूर | प्रतिनिधी
खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी युरियाची गरज वाढत असताना श्रीरामपूर तालुक्यात युरियाचा तुटवडा जाणवत आहे. दुकानदारांकडे युरियाचा बफर स्टॉक दिसत असला तरी तो शेतकऱ्यांना वितरित केला जात नसल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण होत असून, बफर स्टॉक तातडीने खुला करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पेरणीनंतर पावसाला सुरुवात झाल्याने पिकांना खत देण्याची वेळ आली आहे. मात्र, युरियाचा नियमित पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. दुकानांमध्ये खताचा साठा दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उपलब्ध असूनही खत दिले जात नसल्याचा गैरसमज निर्माण होत असून, त्यामुळे वादावादीचे प्रकार घडत आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही खत पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने युरिया उत्पादनावर परिणाम झाला आहे. भारतातील खत उत्पादनात यावर्षी घट झाल्याची माहितीही समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संदीप शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेत युरियाचा बफर स्टॉक लवकरच खुला करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.
बफर स्टॉक तातडीने उपलब्ध करून शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात युरियाचा पुरवठा करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.


