सोलापूर | प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथील पालखी तळ परिसरातील विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली असून ग्रामपंचायत व प्रशासनाने माऊलींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पालखी तळ पूर्णपणे सज्ज झाला आहे.
शनिवार (१८ जुलै) रोजी बरड येथे मुक्काम केल्यानंतर रविवार (१९ जुलै) रोजी पालखी बरड–राजुरी–धरमपुरी–कारुंडे मार्गे नातेपुते मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी नव्याने पालखी तळ उभारण्यात आले असून कारुंडे येथील तळाचेही सुशोभीकरण करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी तळाचे मुरमीकरण करण्यात आले असून भाविकांच्या निवाऱ्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. वारकऱ्यांसाठी स्नानासाठी शॉवर, नळांची व्यवस्था, फिरती शौचालये, मोबाईल चार्जिंग पॉइंट, स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच मंदिराची रंगरंगोटी करून परिसर आकर्षक बनविण्यात आला आहे. मंदिरावर ‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा – कारुंडे तळ’ असा फलकही लावण्यात आला आहे.
याशिवाय स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, कचराकुंड्या, हिरकणी कक्ष, विश्रांती मंडप, उपचार सेवा केंद्र, पाणी टँकर, स्वागत कमानी तसेच मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व कामांमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले आहेत.
पालखी सोहळ्यादरम्यान हजारो वारकरी व भाविक कारुंडे येथे दाखल होणार असल्याने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. माऊलींच्या आगमनाची ग्रामस्थांसह नातेपुते पोलीस, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि प्रशासनातील अधिकारी आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.


