
भिलवडी | प्रतिनिधी
भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या उच्च माध्यमिक विभागात इयत्ता 11 वीच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा कृतीशील सहभाग वाढावा या उद्देशाने कार्यक्रमाचे अनोख्या पद्धतीने नियोजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या भेटवस्तू नवागत विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे स्वागत केले. पेनपासून हस्तकलेच्या विविध वस्तूंपर्यंत अनेक भेटवस्तू देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि सुप्त कलागुणांचे दर्शन घडले. आकर्षक स्टेज सजावट, फनी गेम्स, फिशपाँड तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रम विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. या उपक्रमांचा सर्व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सहसचिव के. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. शालेय शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करत, “विद्यार्थ्यांनी स्वअनुशासन पाळले तर सीसीटीव्हीची गरज भासणार नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. मोरे होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे तसेच पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता भारतीय संस्कृतीचे जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात प्रा. एम. एस. पुजारी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. एस. व्ही. कुकडे यांनी शालेय जीवनातील आवश्यक नियम व सूचनांची माहिती दिली, तर उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा. जी. एस. साळुंखे यांनी विभागाच्या स्थापनेपासूनचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला.
यावेळी उपमुख्याध्यापिका सौ. ए. ए. शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन संस्कृती विभाग प्रमुख सौ. ए. जी. पाटील यांनी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने केले. सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. एम. बी. पाटील यांनी मानले.


