यवतमाळ | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील वाई (मेंढी) येथील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र लाभार्थी असलेल्या एका कुटुंबाचा मनरेगा अंतर्गत मिळणारा मजुरीचा लाभ घरकुल पूर्ण होऊनही अद्याप प्रलंबित असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित कुटुंबाने विविध शासकीय कार्यालयांकडे वारंवार पाठपुरावा करूनही लाभ न मिळाल्याने प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
लाभार्थ्यांचे पुत्र सुधाकर नथुजी भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांचे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल पूर्ण झाले आहे. मात्र, मनरेगा योजनेअंतर्गत मिळणारी पात्र मजुरी अद्याप मिळालेली नाही.
याबाबत 15 नोव्हेंबर 2025 पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ‘आपले सरकार’ पोर्टल, CPGRAMS तसेच संबंधित वरिष्ठ कार्यालयांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या कालावधीत अनेक पत्रव्यवहार, निर्देश आणि अनुपालन अहवाल तयार करण्यात आले. संबंधित विभागाकडून मनरेगा Work Code तयार न झाल्यामुळे लाभ प्रलंबित असल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे.
लाभ न मिळाल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, विद्यार्थी असलेल्या सुधाकर भालेराव यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम झाला आहे. जुलै महिन्याची पॉलिटेक्निक शिक्षणाची फी भरणेही कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.
भालेराव यांनी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर वैयक्तिक आरोप न करता, प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणून शासनाच्या नियमानुसार त्यांच्या वडिलांचा प्रलंबित मनरेगा लाभ तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणासंदर्भातील सर्व अधिकृत कागदपत्रे संबंधित विभागांकडे सादर करण्यात आली असून, आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


