
बांबवडे | प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दमदार पुनरागमन केल्याने तालुक्यातील रखडलेल्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी पुन्हा शेतात उतरले असून शेतीकामांना गती मिळाली आहे.
यंदा मान्सूनचे वेळेत आगमन न झाल्याने शेतकरी सुरुवातीपासूनच चिंतेत होता. त्यातच सलग आठ दिवस पावसाने उघडीप दिल्याने भात रोप लावणीची कामे ठप्प झाली होती. ज्या शेतकऱ्यांनी नदीच्या पाण्याच्या आधारावर लावणी केली होती, त्यांनाही उन्हाच्या तडाख्यामुळे पिके सुकण्याची भीती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी शेतांमध्ये भेगा पडू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला होता.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भात रोप लावणीला पुन्हा वेग आला असून सुमारे ६० टक्के लावणी पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी दिवसभर शेतात मेहनत घेत असून उर्वरित लावणीची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, येत्या काही दिवसांतही पावसाची अशीच साथ कायम राहिल्यास भात पिकासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल. पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामाबाबत नव्याने आशा निर्माण झाली आहे.


