
बांबवडे | प्रतिनिधी
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाने जोर धरला असून धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या संततधार पावसामुळे धरणाने ६२ टक्के पाणीसाठ्याचा टप्पा पार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. चांदोली धरण परिसरात ८३ मिलिमीटर, तर मुख्य जलस्रोत असलेल्या पाथरपुंज येथे १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ धरणात येत असल्याने पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.
१९ जुलै २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, चांदोली धरणात २१.६६ टीएमसी पाणीसाठा असून धरण ६२ टक्के भरले आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच धरण परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आणि पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


