प्रतिनिधी | शिरूर
शिरूर शहरातील ऐतिहासिक पाच कंदील चौकाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिरूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे नगरसेवक सागर नरवडे यांनी ऐनवेळच्या विषयाद्वारे मांडला. या प्रस्तावामुळे शहरात पुन्हा एकदा या विषयावर चर्चा रंगली आहे.
मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजित आंबेकर यांनी यापूर्वी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे यांच्याकडे निवेदन देऊन पाच कंदील चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची तसेच शिरूरचे सुपुत्र व महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांचा नगरपरिषदेच्या वतीने नागरी सत्कार करण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत नगरसेवक सागर नरवडे यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला.
सध्या पाच कंदील चौकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून या चौकाला ऐतिहासिक व राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. १९८६ साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांची याच ठिकाणी झालेली विराट सभा शिरूरच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. त्या ऐतिहासिक स्मृतीच्या जतनासाठी चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी मातोश्री प्रतिष्ठानने जानेवारी २०२५ पासून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्षा, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद, नगरसेवक अभिजित पाचर्णे तसेच भाजपचे शहराध्यक्ष व गटनेते नितीन पाचर्णे यांच्याकडेही निवेदने सादर केली होती.
याबाबत बोलताना अभिजित आंबेकर म्हणाले की, पाच कंदील चौकाला बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेमुळे वेगळी ओळख मिळाली असून त्या इतिहासाचा सन्मान म्हणून चौकाला त्यांचे नाव देणे आवश्यक आहे.
प्रस्ताव मांडताना नगरसेवक सागर नरवडे यांनी सांगितले की, शिरूर नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला असून शहरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
याच प्रस्तावामध्ये महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांच्या कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांचा शिरूर नगरपरिषदेच्या वतीने विशेष नागरी सत्कार करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, हा प्रस्ताव सभागृहात मांडल्यानंतर शहरात त्याबाबत विविध स्तरांत चर्चा सुरू झाली असून, नगरपरिषद यावर काय निर्णय घेते याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.



