सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी गावात शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर दूध ओढ्यात फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावाजवळील ओढ्यात दूध ओतल्यामुळे काही वेळातच पाणी पांढरे झाल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नेमके इतके दूध का फेकण्यात आले याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, अनेक दुधाचे कॅन ओढ्यात रिकामे करण्यात आले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मोठ्या प्रमाणावर दूध वाया घालविण्यामागील कारणाचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मिरज पूर्व भागातील सलगरे येथे अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दूध निर्मिती करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली होती. तपासात दुधातील फॅट वाढवण्यासाठी भेसळ केल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर टाकळी येथे घडलेल्या प्रकाराचा संबंध त्या कारवाईशी जोडला जात असून, अन्न व औषध प्रशासनाच्या धसक्यामुळे भेसळयुक्त दूध पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ओढ्यात फेकण्यात आले असावे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, अधिकृत अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


