सारथी महाराष्ट्राचा न्यूज | लोणार | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दि. २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला लोणार तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड व तालुका सचिव संदीप हिवाळे यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी कथित लाठीचार्ज केला. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांच्या आवाहनानुसार राज्यभर महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार असून, लोणार तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी पक्ष, जात आणि धर्माचे भेद बाजूला ठेवून या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा बंद विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तसेच लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. बंद शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने यशस्वी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, लोणार तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी बंदबाबत जनजागृती करत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली भूमिका नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

