सारथी महाराष्ट्राचा न्यूज | मारेगाव | प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीनंतर तब्बल वीस दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, वेळेवर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पेरणीनंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने पिके वाळण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठी चिंता होती. अखेर झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
या पावसाचा खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांसह कोरडवाहू शेतीलाही मोठा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वेळेवर झालेल्या पावसामुळे यंदा चांगल्या उत्पादनाची आशा निर्माण झाली असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, पुढील काळातही पावसाने अशीच साथ दिल्यास खरीप हंगाम भरघोस होण्यास मदत होईल आणि उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

