
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
समाजकल्याण कार्यालयासमोरील परिसरात अनेक दिवसांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी आणि परिसराचे विद्रूपीकरण झाले होते. मात्र स्थानिक नागरिक, प्राथमिक शाळेतील शिक्षक-विद्यार्थी आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून या ठिकाणाचे हरितस्थळात रूपांतर करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा हटवून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे लावून परिसराचे सुशोभीकरण व हरितीकरण करण्यात आले. या उपक्रमातून स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
उपक्रमानंतर स्थानिक नागरिकांनी या परिसरात पुन्हा कचरा टाकू नये, लावलेल्या झाडांचे संगोपन करावे आणि परिसर कायम स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
पूर्वी कचऱ्यामुळे विद्रूप झालेला हा परिसर आता हिरवाईने नटला असून, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
