
पातुर | प्रतिनिधी :
पातुर पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत गुरुवारी (दि. २३ जुलै) सकाळी धाडसी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या पाच गोवंशांची सुटका केली. या कारवाईत दोन वाहने आणि पाच गोवंश असा एकूण सुमारे ९ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास पातुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास गोसावी यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन मालवाहू वाहनांमधून गोवंश कत्तलीसाठी आणून पातुर नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक २ परिसरात उतरविण्यात येत आहेत. माहितीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईदरम्यान एमएच-०२-सीई-६७२० क्रमांकाची टाटा एस आणि एमएच-३०-बीडी-७६७० क्रमांकाची बोलेरो पिकअप ही दोन वाहने आढळून आली. बोलेरो पिकअपमध्ये तीन, तर टाटा एसमध्ये दोन गोवंश अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ सर्व गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.
या प्रकरणी अब्दुल आलीम अब्दुल करीम कुरेशी (रा. कुरेशी नगर, दहीहांडा), ख्वाजा आसिफ अली ख्वाजा आमिर अली (रा. किल्ला, पातुर) आणि शिवानंद वसंतराव मोकळकर (रा. ढोणे नगर, पातुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान शिवानंद मोकळकर हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५-अ, ५-ब, ९, तसेच प्राण्यांच्या निर्दयतेने वागणूक प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पातुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास गोसावी, बंडू मेश्राम, रोशन पवार, नितीन गजभार आणि साई नवले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना पुढील देखभाल व संरक्षणासाठी गौरक्षण केंद्रात रवाना करण्यात आले.

