
दर्यापूर | प्रतिनिधी :
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व विविध समविचारी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला दर्यापूर शहरात उत्स्फूर्त व भक्कम प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (दि. २३ जुलै) शहरातील गांधी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक एकत्र येत आंदोलन करण्यात आले.
गांधी चौक परिसरात आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवला. यावेळी “विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न – आता आवाज उठवूया” या प्रमुख घोषवाक्याखाली आंदोलन करण्यात आले. सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध फलक घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
महाराष्ट्र बंदला दर्यापूरमधील अनेक व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनीही पाठिंबा दर्शवत आपली दुकाने व आस्थापने बंद ठेवली. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, विविध मित्रपक्षांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

