
नायगाव | प्रतिनिधी :
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नायगाव आणि नरसी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बंदच्या पार्श्वभूमीवर नायगाव व नरसी येथील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने, आस्थापने आणि बाजारपेठा बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, नायगावचा आठवडी बाजार असतानाही व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याशी ऐक्य व्यक्त केले. त्यामुळे दोन्ही शहरांतील प्रमुख बाजारपेठा दिवसभर कडकडीत बंद राहिल्या.
यावेळी नायगावच्या हेडगेवार चौकात वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध नोंदवला आणि संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायगाव पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि भवितव्याच्या संरक्षणासाठी शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
बंद आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी नायगाव येथे पोलीस निरीक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, तर नरसी येथे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनीही शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार भगवानराव हणमंते (अंचोलीकर), युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे (घुंगराळेकर), जिल्हा सचिव बालाजी गायकवाड, जिल्हा सहसचिव बाळासाहेब सोनकांबळे, माजी तालुकाध्यक्ष साहेबराव कोपरेकर, सतीश वाघमारे, मिलिंद बच्छाव, अविनाश गायकवाड, साईनाथ जिगळेकर, युवा उद्योजक कपिल डुमणे, राजू भद्रे, फुले-शाहू-आंबेडकर क्रांती मंचचे संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर, शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, समाजवादी पक्षाचे रणजीत देशमुख, जरांगे पाटील आंदोलन समन्वयक बाळाजी वाघमारे, बबलू नरसीकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक माधवराव गजभारे यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, व्यापारी, नागरिक, पत्रकार आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क आणि भवितव्याच्या संरक्षणासाठी भविष्यातही अशीच एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.


