रत्नागिरी | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ २३ जुलै रोजी रत्नागिरी शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने आयोजित या मोर्चाला विद्यार्थी, युवक, पालक तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन समाप्त झाला. आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करत शिक्षणाचा अधिकार आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आवाज उठविला.
मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी पोलिसांनी केलेल्या नियोजनाचे नागरिकांनी कौतुक केले. संपूर्ण मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
या मोर्चामध्ये वाटद-खंडाळा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षणाचा अधिकार आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण या मागण्यांसाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आला.



