
लातूर | प्रतिनिधी
संपूर्ण लातूर जिल्ह्यातील १०६ सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जळकोट येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, मातंग समाजातील तरुण-तरुणी, महिला, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्वधर्मीय नागरिक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना सांगितले की, १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाचे जीवन प्रभावीपणे मांडले. त्यांनी ३० हून अधिक कादंबऱ्या, अनेक कथा, पोवाडे, लोकगीते आणि नाटके लिहिली. त्यांची ‘फकिरा’ ही कादंबरी विशेष गाजली असून तिला महाराष्ट्र शासनाचा सन्मानही प्राप्त झाला आहे.
तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, समाजजागृतीचे कार्य आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा प्रेरणादायी संदेश यावेळी उपस्थितांना स्मरण करून देण्यात आला.
कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, महापुरुषांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
