पेण | प्रतिनिधी
पेण तालुक्यातील वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी अखेर पेण पोलिस ठाण्यात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खुशबूचे वडील नामदेव ठाकरे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि राजीव गांधी पंचायतराज संघटना यांनी गेल्या दीड वर्षांपासून सुरू ठेवलेल्या न्यायलढ्याला महत्त्वाचे यश मिळाले आहे.
माहितीनुसार, २२ जानेवारी २०२५ रोजी उपचारादरम्यान खुशबूचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी कुटुंबीय, सामाजिक संघटना आणि आदिवासी समाजाने विविध आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केला होता. मात्र, दीर्घकाळ गुन्हा दाखल न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.
अखेर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आल्यानंतर ३० जुलैपासून पेण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.
ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव नंदा म्हात्रे यांनी ही न्यायाच्या लढ्याची केवळ सुरुवात असल्याचे सांगत, या प्रकरणातील इतर संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवरही निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
तसेच, या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करून तपास जलदगतीने पूर्ण करावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या प्रकरणातील सर्व दोषींना शिक्षा मिळेपर्यंत न्यायासाठीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
