
गंगापूर | प्रतिनिधी
मालुंजा बु. ते जिकठाण फाटा या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गंगापूर, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम मंडळ) तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांच्याकडे वारंवार निवेदने देण्यात आली असून अधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली आहे. मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला मंजुरी अथवा प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर नुकत्याच देण्यात आलेल्या निवेदनात ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय न झाल्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गंगापूर कार्यालयाला ताळे ठोकून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत बोलताना कणकोरी गावातील आमदार प्रशांत बंम यांचे युवा कार्यकर्ते अर्जुन पवार यांनी सांगितले की, “रस्त्याच्या प्रश्नावर अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जनतेच्या संयमाचा अंत झाला असून ६ ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला ताळे ठोकून आंदोलन करण्यात येईल.”
सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला असून पावसाळ्यात प्रवास अधिक धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आता या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
