
कुरुंदवाड | प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरासाठी ४९ कोटी रुपयांच्या नव्या नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, बांधकाम समितीचे सभापती अक्षय आलासे, नगरसेवक जय कडाळे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.
यापूर्वी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम संबंधित ठेकेदाराने केवळ १५ टक्केच पूर्ण केले होते. त्यामुळे ही योजना तब्बल १२ वर्षांपासून रखडली होती. विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीदरम्यान आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शासनाने नव्या योजनेला मंजुरी दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
ही नवीन योजना सन २०४८ पर्यंतच्या अपेक्षित लोकसंख्येचा विचार करून तयार करण्यात आली असून, पुढील २५ ते ३० वर्षे शहराला मुबलक, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने, निवेदने आणि शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांची दखल घेत अखेर योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले…
“कुरुंदवाडच्या पाणीप्रश्नासाठी अनेक वर्षांपासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. शासनाने नव्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नवीन यंत्रणेमार्फत काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरवासीयांना दिलेला शब्द पूर्ण झाल्याचा आनंद आहे.”
