
धुळे | प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ निमित्त विशेष पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शेतकरी व पशुपालकांना देशी गोवंश संवर्धन, आधुनिक पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार (भा.प्र.से.) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. राहुल देसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. गिरीश पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले. प्रमुख पाहुणे बाबासाहेब बेलदार यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाचे महत्त्व अधोरेखित करत देशी गोवंशाचे जतन, संवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. बबनराव इल्हे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत शास्त्रशुद्ध पशुधन व्यवस्थापन, मुरघास निर्मिती आणि दुग्ध प्रक्रिया उद्योगाचा अवलंब करून व्यवसाय अधिक फायदेशीर बनवावा, असे सांगितले.
तांत्रिक सत्रात डॉ. राहुल देसले यांनी दुग्ध प्रक्रिया उद्योगातील संधी, डॉ. धनराज चौधरी यांनी देशी गोवंश संवर्धन, मुरघास उत्पादन तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधी, तर डॉ. गिरीश पाटील यांनी पशुपालकांसाठी उपलब्ध विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. याशिवाय श्री. जयेश पाटील यांनी देशी पशुपालनातील आपला यशस्वी अनुभव उपस्थितांसमोर मांडला.
कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या हस्ते गोपूजन करून करण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. धनराज चौधरी आणि डॉ. अतिश पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, लुपिन, टीएनएस तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षण कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि कृषी क्षेत्रातील अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
