
श्रीगोंदा | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या दिव्यांग कल्याण योजनांची सविस्तर माहिती समजून घेऊन त्यांचा लाभ तळागाळातील दिव्यांग बांधवांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी दिल्ली येथे संबंधित केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. भाषेच्या अडचणीमुळे योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने स्थानिक अधिकारी व कार्यकर्त्यांनाही दिल्लीत येण्याचे त्यांनी निमंत्रण दिले.
श्रीगोंदा येथील पंतनगर कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित दिव्यांग बांधवांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र दिव्यांगापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून विशेष प्रयत्न केले जातील.
यावेळी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच दिव्यांग बांधवांच्या मानधनाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या. त्याची तात्काळ दखल घेत खासदार लंके यांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून लाभार्थ्यांच्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या.
कार्यक्रमादरम्यान सुमारे ३०० ते ३५० दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली असून, लवकरच त्यांना आवश्यक सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याची घोषणाही खासदार लंके यांनी केली.
याशिवाय, श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जागेवरच सोडवण्यासाठी लवकरच भव्य ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध मान्यवर उपस्थित होते.
