प्रदीप ताजने
पातुर प्रतिनिधी
पातूर :
गावंडगाव येथे घडलेल्या गंभीर विटंबना प्रकरणातील सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘सकल गोर बंजारा एस.टी. आरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख पावले उचलावीत, असेही या निवेदनात म्हटले आहे.
८ ऑगस्ट २०२६ रोजी गावंडगाव येथे घडलेल्या या विटंबना प्रकरणामुळे संपूर्ण बंजारा समाजात तसेच महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात चान्नी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मुख्य आरोपी अद्याप फरार?
घटनेनंतर गावकऱ्यांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, चान्नी पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई झाल्याचा आरोप समितीने केला आहे. दोन दिवसांनी गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दोन आरोपींना गुन्हे अन्वेषण पथकाद्वारे अटक करण्यात आली. परंतु, मुख्य कथित आरोपी लता गजानन नागोलकर आणि बाली राजेश नागोलकर या दोन्ही महिला आरोपी अद्यापही बाहेर असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या महिला आरोपी शेजारील मळसूर येथे राहत असून, त्यांच्या मुक्त संचारामुळे गावात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महानायकांच्या प्रतिमेची विटंबना
या घटनेमध्ये बंजारा समाजाचे महानायक वसंतरावजी नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा आरोप असून, यामुळे समाजाच्या भावना कमालीच्या दुखावल्या गेल्या आहेत. या संवेदनशील प्रकरणात चान्नी पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पूर्व इतिहास तपासण्याची मागणी
आरोपींची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात यावी. तसेच त्यांच्याविरुद्ध यापूर्वी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocities Act) गुन्हे नोंद झाले आहेत का, याची चौकशी करून त्या गुन्ह्यांचीही नोंद तपासात घ्यावी, असे समितीने म्हटले आहे. याशिवाय, विजय ताले नावाच्या व्यक्तीने या विटंबनेस जाणूनबुजून प्रोत्साहन दिल्याचा आरोप असून, त्यांचीही सखोल चौकशी करून वैभव गजानन नागोलकर व विजय ताले यांच्याबाबत न्यायालयात योग्य ती बाजू मांडण्यात यावी.
१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्ताची मागणी
गावंडगाव येथे महाविद्यालय व आश्रमशाळा असून, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातफेरी व विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आरोपी बाहेर राहिल्यास या कार्यक्रमांच्या वेळी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गावात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी समितीने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या निवेदिनाची आवक नोंद घेतली आहे.






