जळकोट : प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळकोट शहरातील विविध शाळांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. देशभक्तीपर गीतांचे सामूहिक सादरीकरण तसेच विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेमुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
जळकोट येथील गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, राजश्री शाळा, संत ज्ञानेश्वर विद्यालय, शांतामाता शाळा, खाजा गरीबन उर्दू शाळा, इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, अनुसया माता शाळा, महात्मा फुले शाळा आणि मातोश्री आश्रमशाळा आदी शाळांमध्ये विविध देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सामूहिक सादरीकरण केले. तसेच आकर्षक वेशभूषेतून विविध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, भारतीय संस्कृती आणि राष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, एकता आणि शिस्तीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालय परिसरात तिरंगी पताका लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच शाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, पत्रकार डॉ. संजय कलवले यांनी तिरंगा रॅलीत विशेष सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी परिश्रम घेतले.








