सांगोला : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा येथील सराईत गुन्हेगार हणमंत शंकर नरळे याला सोलापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतून तडीपार करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी सांगोला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हणमंत नरळे याच्याकडून मारहाण करून गावात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणे, गोरगरिबांची घरे पेटवून देणे तसेच ग्रामस्थांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करणे, अशी विविध गैरकृत्ये केली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
या प्रकारांमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून, संबंधित व्यक्तीवर जिल्हा तडीपारीची कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाने तात्काळ तडीपारीची कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांच्या या निवेदनामुळे जवळा परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, पोलीस प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.










