श्रीगोंदा :प्रतिनिधी
श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत व देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून गेले. यावेळी प्राचार्यांनी स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य म्हणाले की ,विद्यार्थ्यांनी शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, मानवता, विज्ञाननिष्ठा आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांना आपल्या जीवनात महत्त्व द्यावे. बलशाली आणि सक्षम भारत घडविण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
तसेच संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये समजून घेऊन प्रत्येकाने देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भारत हा युवकांचा देश आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देशसेवेत योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉ. डी. एस. भोसले, प्राचार्य शहाजी मखरे, प्रा.नवनाथ शिंदे,उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, प्रा. श्रीकांत थोरात, भाऊसाहेब औटी, सलीम सय्यद, हिरडे सर, शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक संजय डफळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एन.सी.सी. कॅडेट्स यांनी देखणे संचलन केले. त्यांचे त्याचे नेतृत्व एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. किरण ढवळे यांनी केले. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेजर महेंद्र दरेकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो.डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले.देशभक्तिपर गीते व एन.सी.सी.चे संचलन यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. वातावरण देशभक्तीमय झाले होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.










