कारी : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर संचलित श्री शिवाजी विद्यालय, कारी व शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय, कारी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व नयनरम्य स्वातंत्र्यदिन सोहळा ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इयत्ता दहावी मार्च २०२६च्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थिनी कु. सृष्टी संपत शिंदे व कु. गुंजन बालाजी करळे, तसेच द्वितीय क्रमांक मिळविलेल्या कु. श्वेता हनुमंत बोडके आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. महंमद शेख यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अविनाश पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. नागेश वाघमारे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. विकेश वसावे यांनी मानले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर विविध कवायती अतिशय सुरेख व शिस्तबद्ध पद्धतीने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मास्टर विकेश वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बैठे प्रकार व खडे प्रकारातील कवायती उत्कृष्टपणे सादर केल्या.
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशालेतील जवळपास पंधरा विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी स्वरचित स्वातंत्र्यदिनपर काव्यवाचन अतिशय सुंदर पद्धतीने केले. तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त गीतगायनाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम उत्साहाने व उत्कृष्टपणे सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या कु. अक्षता परशुराम घुमरे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सुशांत बनसोडे, दत्तात्रय चौधरी, काळू आटपळकर, संपत करळे, दाऊद आतार, बालाजी वीर, पांडुरंग डोके, लोकमतचे पत्रकार बालाजी विधाते, जनमतचे पत्रकार आसिफ मुलाणी, तसेच संपत शिंदे, हनुमंत बोडके, बालाजी करळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कारी गावचे सरपंच खासेराव विधाते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेण्याचा संकल्प केला.
विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध कवायती, विविध भाषांतील भाषणे, स्वरचित काव्यवाचन, गीतगायन व स्काऊट-गाईडच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शाळेच्या इतिहासातील सर्वात मोठा व नयनरम्य स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.











