बांबवडे :
सुमारे ६० गावांचे मध्यवर्ती केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबवडे परिसरात रात्रीच्या वेळी आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात सुमारे ५० खासगी हॉस्पिटल्स, ४० मेडिकल स्टोअर्स आणि अनेक पॅथॉलॉजी लॅब उपलब्ध असतानाही रात्री ८ नंतर आपत्कालीन आरोग्यसेवेसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आरोग्य सुविधांना टाळे; रुग्णांची मध्यरात्री वणवण
अचानक ताप, उलट्या-जुलाब, अपघात, सर्पदंश किंवा रक्तदाबासंबंधी त्रास अशा आपत्कालीन परिस्थितीत रात्रीच्या वेळी औषधे व आवश्यक वैद्यकीय सेवा मिळणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक पातळीवर तातडीची सुविधा उपलब्ध न झाल्यास गंभीर रुग्णांना कोल्हापूर किंवा मलकापूर येथे घेऊन जावे लागत आहे. उपचार मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
प्रमुख अडचणी
मेडिकल स्टोअर्स बंद : परिसरात ४० हून अधिक मेडिकल स्टोअर्स असूनही रात्रीच्या वेळी आवश्यक औषधे मिळणे कठीण होत असल्याची तक्रार आहे.
शासकीय आरोग्य केंद्रातील सुविधा : सामान्य नागरिकांचा आधार असलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी पुरेसे डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तातडीच्या तपासण्यांची अडचण : रात्रीच्या वेळी रक्त किंवा लघवीच्या तातडीच्या तपासण्यांसाठी लॅब बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
बांबवडे परिसरातील मेडिकल स्टोअर्स आणि पॅथॉलॉजी लॅब रोटेशन पद्धतीने रात्रीच्या वेळेत सुरू ठेवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच शासकीय आरोग्य केंद्रात २४ तास डॉक्टर, परिचारिका आणि आपत्कालीन औषधांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“बांबवडे हे सुमारे ६० गावांसाठी मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री आजारी पडणाऱ्या रुग्णांना तातडीने आरोग्यसेवा मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.”
— पै. विजय बोरगे, माजी जि. प. सदस्य
रात्रीच्या वेळी आरोग्यसेवेचा अभाव हा नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

