
सोनगाव | वार्ताहर
सोनगाव व परिसरातील वाडी-वस्तीवर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक तसेच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सकाळच्या वेळेस शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि नागरिकांना नदीवरील पुलाजवळ, अनापवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ तसेच परिसरातील विविध ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता हीच कुत्री मळहद्दीकडे येऊन शेतकऱ्यांच्या पशुधनावरही हल्ले करू लागल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे.
मागील आठवड्यात येवलकर वस्ती येथील दोन शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर मोकाट कुत्र्यांनी गोठ्यात घुसून हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बकऱ्या गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नुकतीच पेरणी केलेल्या मका आणि सोयाबीनच्या शेतातही मोकाट कुत्री घुसून पिकांचे नुकसान करत असल्याच्या तक्रारी आहेत.
आधीच रानडुक्कर आणि रानटी सशांमुळे पिकांचे नुकसान होत असताना आता मोकाट कुत्र्यांच्या समस्येची भर पडल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.
मोकाट कुत्री इतर नगरपालिका किंवा नगरपंचायत हद्दीतून आणून सोडली जात असल्याचा संशय असल्यास संबंधित प्रशासनाशी तातडीने पत्रव्यवहार करून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी ग्रामपंचायतीतील पदाधिकारी पुढे न आल्याची नाराजीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि शेतकऱ्यांच्या पशुधनाचा प्रश्न निर्माण झालेला असताना ग्रामपंचायतीने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून गावातील विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच आता नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
“आम्हाला आमचा हक्क हवा आहे, आम्हाला सुरक्षितता हवी आहे. बाधित शेतकऱ्यांना न्याय आणि नियमानुसार नुकसानभरपाई मिळाली पाहिजे,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
