कवठे महांकाळ तालुका प्रतिनिधी: कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या सर्व सफाई कामगारांना सेवेत कायमस्वरूपी (परमनंट) करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाने आज आमदार सुहास दादा बाबर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी कामगारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, “आम्ही गेली २० ते २५ वर्षे झाली नगरपंचायतीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सफाईचे काम करत आहोत. ऊन, वारा, पाऊस आणि कोरोनासारख्या महामारीच्या काळातही जीवाची पर्वा न करता आम्ही शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. मात्र, इतकी वर्षे सेवा करूनही आम्हाला आजपर्यंत परमनंट करून घेतले नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, भविष्याची कोणतीही शाश्वती नाही.”
कामगारांचे हे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आमदार सुहास भैय्या बाबर यांनी कामगारांना सकारात्मक आश्वासन दिले. ते म्हणाले की, “तुमचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आणि मानवतेचा आहे. सफाई कामगार हा शहराच्या स्वच्छतेचा कणा आहे. मी स्वतः या विषयात लक्ष घालून तुमचा मार्ग मोकळा करतो. हा विषय मी थेट कॅबिनेटमध्ये घेऊन जाईन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून तुम्हाला लवकरात लवकर परमनंट करण्याचा प्रयत्न करेन.”
आमदारांच्या या आश्वासनामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदारांचे आभार मानले आहेत.
या बैठकीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहन दादा जाधव, तालुका संघटक अजित पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख संतोष भोसले, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुतार, संभाजी बाबर, सुहास शिंदे, अजित घोरपडे, उमेश सुतार, अनिल पवार यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमचे २०-२५ वर्षांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. नगरपंचायत प्रशासनालाही याबाबत सूचना करून शासन स्तरावर पाठपुरावा करून तुम्हाला न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे – आ. सुहास दादा बाबर









