पत्रकारांवरील हल्ले खपवून घेणार नाही : दत्ता गाडगे
श्रीगोंदा :प्रतिनिधी
यापुढे पत्रकारांवर हल्ले खपवून घेणार नाही, प्रसंगी पत्रकारांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरू! असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांनी दिला आहे. साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आक्रमक झाला असून, संघटनेच्या वतीने आज पारनेर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरुवारी सायंकाळी सुशील थोरात यांच्यावर हल्ला झाला असून,अवैध व्यवसायांविरोधात बातमी केल्याच्या रागातूनच हा हल्ला केला आहे.सुदैवाने थोरात या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले आहेत.
हल्लेखोरांना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तसेच त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी करून मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केली आहे.
“आज सुशील थोरात यांच्यावर हल्ला झाला, उद्या दुसऱ्या पत्रकारावर होऊ शकतो.पत्रकारांच्या पाठीशी कोणी नाही, असे कोणीही समजू नये. पत्रकारांवर हल्ले यापुढे खपवून घेणार नाही. गरज पडल्यास पत्रकारांच्या संरक्षणा साठी रस्त्यावर उतरू.”असे दत्त गाडगे म्हणाले .
पारनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांकडे पाठवण्याचे तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, तालुकाध्यक्ष संतोष तांबे, उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, पारनेर शहराध्यक्ष भगवान गायकवाड आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.







