‘मायबाप’ जनतेकडे लक्ष देणार कोण?मुक्ताईनगर:सध्या मुक्ताईनगर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक वास्तव समोर येत आहे. तालुक्यात ‘दोन नंबर’ आणि बेकायदेशीर धंद्यांनी अक्षरशः टोक गाठले असून, सर्वसामान्य जनता यात होरपळून निघत आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील दोन बडे आणि दिग्गज नेते एकमेकांसमोर दंड थोपटून उभे असताना, त्यांच्याच नाकाखाली हे अवैध धंदे जोरात सुरू आहेत. राजकीय साठमारीत आणि श्रेयवादाच्या लढाईत गुंतलेल्या या नेत्यांना जनतेच्या वेदनांचा विसर पडला आहे का? असा संतप्त सवाल आता मुक्ताईनगरची जनता विचारत आहे.नेत्यांची ‘जुगलबंदी’, अवैध धंद्यांची ‘चांदी’!मुक्ताईनगरच्या राजकारणात दोन मोठ्या नेत्यांचे वर्चस्व सर्वांनाच माहिती आहे. परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नाहीत.
परंतु, याच राजकीय धुमश्चक्रीचा फायदा घेत तालुक्यात अवैध दारू, सट्टा, जुगार आणि वाळू तस्करीसारखे बेकायदेशीर धंदे राजरोसपणे सुरू आहेत. “नेते आमचे भांडण्यात व्यस्त, अन दोन नंबरवाले मजेत मस्त,” अशीच काहीशी परिस्थिती सध्या मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळत आहे. या बेकायदेशीर धंद्यांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.जनता बेकार, प्रशासन सुस्त!एकीकडे बेरोजगारी आणि महागाईमुळे सामान्य जनता आधीच हतबल झाली आहे. त्यातच या अवैध धंद्यांनी शहरात आणि ग्रामीण भागात पाय पसरल्यामुळे गरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक उघडपणे करत आहेत. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे धंदे एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालूच शकत नाहीत, असा दाट संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे….तर जनतेचा वाली कोण?आज मुक्ताईनगरच्या जनतेला एकाच प्रश्नाने सतावून सोडले आहे – “आमच्याकडे लक्ष कोण देणार?” दोन्ही नेते स्वतःला जनतेचे सेवक म्हणवून घेतात, मात्र प्रत्यक्षात या वाढत्या गुन्हेगारीवर आणि अवैध धंद्यांवर बोलायला कोणीही तयार नाही. निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागणारे हे नेते आज जनतेला वाऱ्यावर सोडून मोकळे झाले आहेत.आता हवाय हक्काचा ‘लोकप्रतिनिधी’!मुक्ताईनगरला आता अशा एका खऱ्या आणि डॅशिंग प्रतिनिधीची गरज आहे, जो या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडेल. नेत्यांच्या दबावाला बळी न पडता, जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारा आणि या ‘दोन नंबर’ धंद्यावाल्यांना जेलची हवा दाखवणारा हक्काचा लोकप्रतिनिधी कधी मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे डोळे लागले आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली, तर येणाऱ्या काळात जनता या दोन्ही नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आता जनमानसातून दिला जात आहे.






