बार्शी तालुका प्रतिनिधी : शशिकांत काकडे
बार्शी तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. पावसाअभावी सोयाबीन, उडीद, तूर यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, दसरा-दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात येणारे रोख उत्पन्नही धोक्यात आले आहे.
यासोबतच द्राक्ष, ऊस, डाळिंब, बोर यांसारख्या बागायती पिकांवरही कमी पावसाचा परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाण्याअभावी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
एकीकडे महागाईचा वाढता बोजा आणि दुसरीकडे निसर्गाच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी दररोज आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, शेतीची कामे ठप्प होत असल्याने शेतमजुरांनाही काम मिळत नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असून, शासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बार्शी तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
शासनाने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







