तालुका प्रतिनिधी : शशिकांत काकडे
वैराग : वैराग येथे संतनाथ महाराज यात्रा महोत्सव सुरू असतानाच शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यात्रा काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात वीजपुरवठ्याच्या परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वैराग ही परिसरातील मोठी बाजारपेठ असून, वारंवार वीज खंडित होत असल्याचा थेट परिणाम विविध व्यवसायांवर होत आहे. टेलरिंग, वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, झेरॉक्स, फोटो स्टुडिओ यांसह अनेक व्यवसायांना वीज नसल्यामुळे कामकाजात अडथळे येत आहेत. तसेच शासकीय कार्यालयांमधील कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यात्रेनिमित्त वैराग शहरात मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वैराग परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे.
यात्रा काळात तरी वीजपुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वैराग ग्रामस्थ, व्यापारी व व्यावसायिकांकडून होत आहे.








