अविनाश जाधव वार्ताहर
कळंबोली पनवेल प्रतिनिधी :- तब्बल दोन jवर्षांच्या रायगड जनतेच्या प्रतीक्षेनंतर रायगड जिल्ह्याला अखेर पालकमंत्री लाभले. महायुती सरकारकडून शिवसेना नेते भरतशेठ गोगावले यांच्याकडे रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आल्याची घोषणा होताच, पनवेलमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या नियुक्तीचे स्वागत करत पनवेल येथील शिवसेना कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.
श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाची लहर उमटली आहे.
विकासाला अधिक वेग मिळेल: परेश पाटील
यावेळी प्रतिक्रिया देताना शिवसेना पनवेल उपजिल्हाप्रमुख परेश पाटील म्हणाले, “भरतशेठ गोगावले हे सर्वसामान्य नागरिक आणि गरिबांच्या प्रश्नांवर नेहमी धावून जाणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक वेग मिळेल आणि प्रलंबित प्रश्नांची सुटका होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
सक्षम नेतृत्वामुळे जिल्ह्याला न्याय: प्रथमेश सोमण
शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी नियुक्तीचे स्वागत करताना सांगितले, “दीर्घ काळानंतर रायगड जिल्ह्याला एक सक्षम आणि अभ्यासू पालकमंत्री मिळाला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचे काम गोगावले साहेब करतील. या निर्णयाने शिवसैनिकांना आणि जिल्ह्याला योग्य न्याय मिळाला आहे.”










