जत / प्रतिनिधी(अरुण कोळी)
जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि म्हैसाळ योजनेचे आवर्तन निरंतर सुरू ठेवावे, या प्रमुख मागण्यांसाठी दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
जत तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावली असून जत पूर्व व दक्षिण भागात १००० फूट विंधन विहिरी खोदूनही पाणी लागत नसल्याची वस्तुस्थिती आहे. बहुतांशी साठवण तलाव कोरडे पडले आहेत. शेतीला व जनावरांना चारा-पाणी मिळणे दुरापास्त झाले असून पाणी व चाऱ्याअभावी पशुधन तडफडत आहे.
पशुपालक व शेतकरी आपली जनावरे खाटकाच्या दावणीला जाऊ नयेत म्हणून चारा-पाण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत. माडग्याळ येथे तालुक्यातील पहिला चारा डेपो सुरू करण्यात आला असून यावरून दुष्काळाची तीव्रता लक्षात येते.
तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून मजूर रोजगारासाठी अन्य राज्यात स्थलांतरित होत आहेत.
प्रमुख मागण्या :
१. जत तालुका त्वरित दुष्काळी म्हणून जाहीर करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात.
२. म्हैसाळ योजनेचे आवर्तन कायमस्वरूपी सुरू ठेवावे व बंदिस्त पाईपलाईनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत.
३. गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे, वृक्ष लागवडीची कामे सुरू करावीत.
४. गरज असलेल्या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत.
५. तालुक्यात सुरू असलेली बेकायदेशीर वृक्षतोड त्वरित थांबवावी. साळमळगेवाडी, जिरग्याळ रस्त्यावरील सुझलॉन कंपनीने केलेल्या मोठ्या झाडांच्या बेकायदेशीर वृक्षतोडीची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी. दररोज ४० ट्रक लाकूड तालुक्याबाहेर जात असून याचीही चौकशी व्हावी.
शासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा गुरुवार दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले साहेब, जिल्हाधिकारी सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, पोलीस निरीक्षक जत, वनक्षेत्रपाल अधिकारी जत, तहसीलदार जत व गटविकास अधिकारी जत यांना पाठविण्यात आल्या आहेत.











