स्मारक समितीच्या वतीने १०६ वी जयंती उत्साहात; ग्रामसेवक बालाजी जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा, सरपंच सुलावती डुकरे यांची प्रमुख उपस्थिती
तालुका प्रतिनिधी : प्रवीण इंगळे
उमरखेड :
साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नागापूर-रूपाळा येथे अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी स्मारक समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक श्री. बालाजी जोगदंड साहेब होते. तर गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सुलावती डुकरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचे स्मरण केले.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून कष्टकरी, श्रमिक, वंचित आणि शोषित समाजाच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या साहित्याने समाजामध्ये आत्मभान, संघर्षाची प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाची चेतना निर्माण केली. त्यांच्या विचारांचा आणि साहित्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी भीमराव राठोड, गंगाधर काळे, कैलास कदम, पोलीस पाटील सदानंद तोडासे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील खोलगडे, मोहसीन खान पठाण, जयपाल ठोके आणि शुभम देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे कार्यकर्ते अनिल रणखांब, संतोष काळे, नितीन भांडवले, दुर्गेश गायकवाड, अजय गायकवाड, मल्हारी काळे, संतोष गायकवाड, दीपक भांडवले, कृष्णा काळे, किरण भांडवले, सुमित काळे, रितेश शिरसाट, करण पवार आणि पुंजाराम गजभार यांच्यासह स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या ‘जग बदल घालुनी घाव’ या परिवर्तनवादी विचारांना उजाळा देत त्यांच्या महान कार्याला अभिवादन केले. अण्णाभाऊंच्या साहित्यिक आणि सामाजिक विचारांचा जागर करण्याचा निर्धार व्यक्त करत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







