
प्रतिनिधी : सतीश नेवारे
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
गडचिरोली, दि. ३ सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून, त्याचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यातील अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूकंपानंतर प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून, प्राथमिक माहितीनुसार अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही.
दरम्यान, नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये, शांतता राखावी आणि आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसेच भूकंपासंदर्भातील अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





