टाटा ट्रस्ट्स व मोबाईल क्रेचेसच्या पुढाकारातून बालकांच्या पोषण, संगोपन व विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. ४ सप्टेंबर २०२६
बुर्गी : ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांना पोषणयुक्त, सुरक्षित, प्रेमळ आणि गुणवत्तापूर्ण बालसंगोपन व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टाटा ट्रस्ट्स आणि मोबाईल क्रेचेस यांच्या सहकार्याने “पोषण, संगोपन आणि सक्षमीकरण : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील प्रारंभिक बालविकास उपक्रम” राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे क्रेच केंद्राचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला.
“आजची सुदृढ व सुपोषित बालके, उद्याचा सक्षम समाज!” या संदेशातून बालकांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांना दर्जेदार पोषण, आरोग्य सेवा तसेच सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एटापल्ली तालुक्यात ७ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी चार क्रेच केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
सन १९७३ पासून सामाजिक परिवर्तन व विकासासाठी कार्यरत असलेल्या टाटा ट्रस्ट्सच्या सामाजिक बांधिलकीला, तसेच सन १९९९ पासून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या मोबाईल क्रेचेस संस्थेच्या अनुभवाला स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याची जोड मिळाल्याने हा महत्त्वपूर्ण उपक्रम साकारत आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला श्री. अविश्यांत पांडा (IAS), जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, गडचिरोली, तसेच श्रीमती जयिता चौधरी, पोषण विभाग प्रमुख, टाटा ट्रस्ट्स, श्रीमती सुमित्रा मिश्रा,मोबाईल क्रेचेस, सुहास गाडे मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली, अमर राऊत, SDM एटापल्ली, हेमंत गांगुर्डे, तहसीलदार एटापल्ली यांच्यासह जिल्हा व तालुका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
यावेळी पैमा येथील पोलीस पाटील लुलाजी तलांडी, दानू तलांडी, कोलू तलांडी, कल्पना तलांडी, इमला तलांडी, पिली आत्राम, सुगत उराडे, बुर्गी, विनोद हिचामी, बुर्गी, साई पुंगाटी, अमराज पुंगाटी,मुन्ना पुंगाटी, सरपंच जवेली खुर्द, ललिता मडावी, सरपंच येमली, पी.ओ. ओंडर सर, जि.प. शाळा मुख्याध्यापक पैमा, आर. धुर्वे मॅडम, सचिव ग्रामपंचायत बुर्गी, नीता खोब्रागडे, अंगणवाडी सेविका पैमा, प्रीती तलांडी, अंगणवाडी मदतनीस पैमा यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
“बालपण जपुया… बालविकास घडवूया… उज्ज्वल भविष्य घडवूया!” या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे क्रेच केंद्र दुर्गम भागातील लहान बालकांच्या आरोग्य, पोषण आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.










