प्रतिनिधी : सुगत उराडे
04 सप्टेंबर 2026
पेंढरी व झाडापापडा इलाख्यात वाघाचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, परिसरातील तब्बल ३८ गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांच्या जीवितासह शेतकरी व पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक इलाका महाग्रामसभा झाडापापडा (पेंढरी), ता. धानोरा, जि. गडचिरोली यांच्या वतीने वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी गडचिरोली येथील उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सरपंच परमेश्वर गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. पेंढरीसह झाडापापडा इलाख्यातील ३८ गावांच्या परिसरात वाघाचा सातत्याने वावर आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकरी शेतात जाण्यास धजावत असून, पशुधनाच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाची नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
‘नागरिकांच्या जीविताशी खेळ नको; वनविभागाने तातडीने ठोस कारवाई करावी,’ अशी संतप्त भूमिका ग्रामस्थांनी मांडली. वनविभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर गडचिरोली येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.









