
प्रशासनाला अंतिम इशारा; “आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे”
प्रतिनिधी : कुरुंदवाड : कुरुंदवाड शहराच्या प्रवेशद्वाराजवळील जुने शिवस्मारक पाडून त्या ठिकाणी भव्य शिवतीर्थ उभारण्याचे काम शासन व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून शिवतीर्थाचे काम रखडल्याने कुरुंदवाडकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवतीर्थासह शहरातील विविध प्रलंबित नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कुरुंदवाड नगरीच्या विशेष विकास आराखड्यातील विविध कामे तसेच अनेक नागरी सुविधा वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. अर्धवट राहिलेली जुनी कामे पूर्ण करण्याऐवजी नवीन कामांना प्राधान्य दिले जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासन आणि मुख्याधिकारी नेमकी कोणती कार्यवाही करीत आहेत, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील विविध प्रश्नांबाबत नागरिकांनी वारंवार निवेदने देऊन तसेच सातत्याने पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. “एका प्रश्नासाठी किती निवेदने द्यायची आणि किती वर्षे पाठपुरावा करायचा?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शिवतीर्थ हा केवळ विकासकामाचा विषय नसून कुरुंदवाडच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि जनभावनेचा प्रश्न असल्याचे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती व विविध संघटनांनी म्हटले आहे. “शिवतीर्थ झालेच पाहिजे,” या मागणीसाठी २८ सप्टेंबर रोजी २४ तास कुरुंदवाड बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन शिवतीर्थाच्या रखडलेल्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा समिती व विविध संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
“निवेदने खूप झाली, पाठपुरावा खूप झाला आणि आश्वासनेही खूप झाली. आता कुरुंदवाडकरांना आश्वासन नको, तर प्रत्यक्ष काम हवे आहे. शिवतीर्थ झालेच पाहिजे आणि कुरुंदवाडचा स्वाभिमान जपलाच पाहिजे,” अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या स्वागत कमानीच्या कामालाही अद्याप सुरुवात झालेली नसल्याने हे काम नेमके कधी सुरू होणार, असा प्रश्नही छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती आणि कुरुंदवाडकरांनी उपस्थित केला आहे.
