
फळझाडांसह विविध वृक्षांची लागवड; संगोपन व संवर्धनाचा शेतकरी गटाचा संकल्प
जामखेड : प्रतिनिधी | दि. ८ सप्टेंबर २०२६
जामखेड तालुक्यातील सारोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात सावळेश्वर शेतकरी गट, सारोळा यांच्या वतीने विविध फळझाडांसह इतर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. शालेय परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सावळेश्वर शेतकरी गट हा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत कार्यरत आहे. गटाच्या सदस्यांनी शालेय परिसरात पेरू, आंबा, चिकू, जांभूळ आदी फळझाडांसह विविध वृक्षांची लागवड केली.
या उपक्रमात ज्ञानेश्वर कल्याण जगदाळे, गणेश मोहन काशीद, हरिभाऊ शिवाजी मुळे, बापूराव नामदेव तांबे, किशोर यादवराव पवार, संदिप यादवराव पवार, राजेंद्र नारायण मुळे, गणेश मनोहर काशीद, अशोक सुदाम काशीद, अशोक विश्वनाथ भोसले व रामभाऊ एकनाथ तांबे यांनी सहभाग घेतला.
केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प शेतकरी गटाच्या सदस्यांनी यावेळी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजण्यास मदत झाली.
यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. शालेय परिसरात राबविण्यात आलेला हा वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरला.
