
पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे पिके संकटात; अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येची आमदारांकडून तातडीने दखल
मालेगाव : प्रतिनिधी | दि. ९ सप्टेंबर
तालुक्यातील कळंबेश्वर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने संकटात सापडली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात जात असले तरी अपुऱ्या व अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीपंप सुरू करणे शक्य होत नसल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत.
शेतकऱ्यांची ही समस्या आमदार अमित झनक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर तसेच आवश्यक विद्युत वितरण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची शिफारस आमदार झनक यांनी महावितरणकडे केली आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून कळंबेश्वर परिसराची तांत्रिक पाहणी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होऊन वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या समस्येच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश पायरू अवचार यांच्या पुढाकाराने शिवदास तांबेकर, नामदेव गव्हांदे, सुरेश अवचार, शोभा बोराटे, देविदास वानखेडे, राजेश बोराटे, प्रकाश चतरकर, यशवंत पठाडे, शंकर बोरचाटे आणि दाजिबा अवचार यांनी पाठपुरावा केला. आमदार झनक यांच्या तातडीच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
