
तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प; पाच दिवसांत दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी
मुलचेरा : प्रतिनिधी
नगरपंचायत मुलचेरा अंतर्गत मौजा कोपरल्ली माल येथील प्रभाग क्रमांक १५ मधील सोलर ड्युअल पंपवर कार्यान्वित असलेली नळपाणीपुरवठा योजना मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत नगरपंचायत प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही अद्याप आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप निवेदकांनी केला आहे.
मे महिन्यापासून सदर नळपाणीपुरवठा योजना बंद असल्याने विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या शेतीच्या कामांना सुरुवात झाली असून, त्यातच पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. वारंवार सूचना करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बंद पडलेली नळयोजना सुरू करण्याबरोबरच तुटलेले स्टँड पोस्ट दुरुस्त करणे, नवीन प्लॅटफॉर्म तयार करणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, नवीन फिल्टर बसविणे तसेच नादुरुस्त मोटरची दुरुस्ती करणे आदी कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर सर्व कामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. विहित मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास महिला व नागरिकांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर प्रशासनाच्या निषेधार्थ ‘घागर मोर्चा’ काढण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत नगरपंचायत अध्यक्ष, तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी तसेच नगरपंचायतीचे सभापती व सर्व नगरसेवक यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
निवेदनावर प्रमोद गोटेवार, मुरलीधर ओडेंगवार, अंकुश गोंगले, ध्रुप दिवटीवार आणि एकनाथ गरतुळवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची तारीख १० सप्टेंबर २०२६ असून, कोपरल्ली माल येथील पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
