
अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान; विशेष सर्वेक्षण व पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी
वाशी : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, जिल्ह्यात तातडीने विशेष सर्वेक्षण व पंचनामे करून परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी शासनाकडे केली आहे.
माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री असलेल्या आमदार सावंत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिकांची वाढ समाधानकारक झालेली नाही. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस तसेच इतर खरीप पिकांवर पावसाच्या कमतरतेचा गंभीर परिणाम झाला असून काही भागांत पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उत्पादन खर्च वसूल करण्याचेही संकट उभे राहिले आहे.
निवेदनात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व पाणी, भूजल पातळी आणि ग्रामीण भागातील रोजगाराच्या प्रश्नांकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण, पिकांची प्रत्यक्ष स्थिती, जमिनीतील ओलावा, जलसाठे, भूजल पातळी, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यांचा सर्वंकष विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळ जाहीर केल्यानंतर उपाययोजनांची मागणी
आमदार सावंत यांनी शासनाकडे शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये पीक नुकसानभरपाई व दुष्काळी अनुदान तातडीने देणे, खरीप पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे मदत देणे, पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करणे आणि पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी विशेष कार्यवाही करणे यांचा समावेश आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा व इतर रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत अथवा स्थगिती द्यावी, पुढील हंगामासाठी बियाणे, खते व इतर आवश्यक कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिव जिल्ह्यासाठी परिस्थितीच्या गांभीर्यानुसार विशेष दुष्काळी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत असून परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी शासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक निकषांच्या आधारे कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकरी व ग्रामीण जनतेला तातडीने आर्थिक व प्रशासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली आहे.
