गरिबीतून वर आलेली आणि गरिबीची जाण असलेली व्यक्ती कितीही यशस्वी झाली, तरी हाताखाली काम करणार्या कुणाशीही वागताना कायम ‘माणूस’ म्हणून वागते… असं म्हणतात ज्या घरात धुणीभांडी करणारी बाई अनेक वर्ष टिकते त्या घराची मालकीण माणुसकी जपणारी असते !
…यशवंतराव चव्हाण यांची एक लै मजेशीर पण हृदयस्पर्शी आठवण आहे. त्यांची आई विठाई ही कष्टकरी मजूर महिला होती. नवर्याच्या निधनानंतर अतिशय हलाखीच्या परिस्थितीत तिनं यशवंताला लहानाचं मोठं केलं. पोरानंही या कष्टाची बूज राखली. मन लावून शिकला. आधी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता… नंतर थेट आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते थेट उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली.
…बावन्न साली पहिली विधानसभा निवडणुक जिंकल्यावर मोरारजी देसाईंच्या मंत्रीमंडळात यशवंतराव नागरी पुरवठा आणि समाजकल्याण मंत्री झाले. मुंबईला रहायला आले. येताना त्यांनी आईलाही सोबत आणलं. मंत्रीपद असल्यामुळं साहेबांना चोवीस तास पोलीस संरक्षण होतं. विठाईनं एकेकाळी पोरगा स्वातंत्र्यलढ्यात भुमिगत झालेले दिवस पाहिले होते. ब्रिटीश राजवटीतले पोलीस यशवंताचा शोध घेण्यासाठी घरी येऊन झडती घ्यायचे. वाट्टेल तसं बोलायचे. अपमान करायचे.
…आज आपलं पोरगं एवढं मोठं झालंय की पोलीस अधिकारी येता-जाता त्याला सलाम करतात हे बघून तिला पोराचं लै कवतिक वाटायचं. डोळे भरून हा रूबाब ती बघत रहायची.
एक दिवस मध्यरात्री विठाबाईंना जाग आली. परत झोपच लागंना, म्हणून त्या सहज चालत बाहेरच्या दारापर्यंत आल्या. तिथं बाहेर दोन पोलीस पहारा देत होते. विठाबाई मायेने त्यांना म्हणाल्या, “आरं लेकरांनू, का उगं ताटकळत उभं र्हायलाय? येसवंता कवाच झोपला. तुमीबी झोपा आता.”
पोलीसांना काय करावं कळंना. “हो हो” करत उभेच राहिले. विठाबाई लगबगीनं आत गेल्या. घरातल्या काहीजणांना उठवलं आणी सांगीतलं, “भाईर ती लेकरं बिचारी ताटकळत उभी र्हायलीत. त्यास्नी सतरंजी,चादर, उशीबिशी न्हिऊन द्या. झोपा म्हनावं आता.” घरात काहीतरी गोंधळ सुरूय हे जाणवून यशवंतराव जागे झाले. बाहेर आले. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ते हसून त्या पोलिसांना म्हणाले, “झोपा. आता तुम्ही झोपल्याशिवाय आमची आई झोपणार नाही. झोपा. झोपा.”
असे राजकारणी या महाराष्ट्रानं पाहिलेत भावांनो ! ज्याचा धर्म एकच होता, ‘माणुसकी’. अशा नेत्यांमुळेच आपले बापजादे शांत, समाधानी, समृद्ध आयुष्य जगले. आजच्या या भ्रष्ट नेत्यांनी राजकारणच नव्हे तर सर्वसामान्य माणसाचं जगणं नासवलं आहे… पण त्यांना हे कळत नाही की त्यामुळे त्यांचं स्वत:चंही आयुष्य बरबाद झालंय. रस्त्यावरचा टायर फुटला तरी ‘आपल्याला मारायला कुणीतरी बाॅम्ब फोडला’ असं समजुन, भेदरून रात्र जागवावी लागते त्यांना. यांनी कितीबी जाहिरातबाजी करून स्वत:ला वाघ ठरवूद्यात… यशवंतराव चव्हाणांसारखं आपल्या प्रोटेक्शनला असलेल्या पोलीसांना ‘झोपा’ असं सांगायला निर्मळपणा, बिनधास्तपणा आणि वाघाचं काळीज लागतं गड्याहो… ते या नेत्यांकडं नाही !
🙏 रामकृष्णहरि 🙏
-नंदकुमार बगाडेपाटिल
9822538415
Discussion about this post